प्रतिनिधी द महाराष्ट्र
: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार असून
ग्रामीण भागातील बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर ११ ते १८ जुलैदरम्यान विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेहून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी खडी मशीन चौक–
कात्रज–कापूरहोळ मार्गाचा वापर करावा. तर सासवडकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक गराडे–खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.
१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणेहून सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निराकडे जाणाऱ्या तसेच नीराहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
१५ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाल्हे ते लोणंद या टप्प्यात पालखी मुक्काम असल्याने पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा मार्गावरील वाहतूक सासवड–जेजुरी–मोरगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
तसेच १५ ते १८ जुलै या कालावधीत लोणंद–फलटण मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे
फलटण व लोणंद येथून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी शिरवळ मार्गाचा वापर करावा. त्याचप्रमाणे पुणेहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूकही शिरवळ मार्गे वळविण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक सहभागी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी
पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















