प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:
सासवड–सोनोरी मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे तसेच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी, अशी मागणी मल्हारगड युथ
फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश काळे (रा. सोनोरी, ता. पुरंदर) यांनी सासवड नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सासवड नगरपालिका हद्दीतील सासवड–सोनोरी रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत
महत्त्वाचा असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा
त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी.
तसेच नगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत
आहे. कचऱ्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करणे कठीण झाले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढत असून भटकी कुत्रीही
मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा सर्व कचरा
तातडीने हटवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि संपूर्ण रस्ता नागरिकांच्या वापरासाठी सुरक्षित व खुला करावा.
या मागण्यांवर सासवड नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा मल्हारगड युथ फाऊंडेशनने व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















