प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज
तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या सासवड नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक हैराण झाले
आहेत. विशेषतः गावठाण भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, पथदिवे आणि रस्त्यांची दुरवस्था ही गंभीर समस्या बनली
आहे. या विरोधात माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ११) मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना घेराव घालून तीव्र निदर्शने केली.
सासवडमध्ये सध्या स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जागोजागी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे
घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, तर जुन्या जलवाहिन्यांमुळे पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. शहरात भाजी विक्रेत्यांसाठी निश्चित जागा नाही, डुकरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. बंद असलेली उद्याने आणि महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव अशा अनेक समस्या यावेळी समोर आल्या.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय जगताप यांनी प्रशासनावर निधी अडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सासवडचे नाव खराब करण्यासाठी प्रशासन जाणूनबुजून विकासकामांमध्ये अडथळे आणत आहे आणि निधी नसल्याचे कारण देत आहे. जर येत्या आठ दिवसांत शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि पथदिव्यांची कामे
झाली नाहीत, तर १९ ऑगस्ट रोजी ‘गाव बंद’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांना दिला.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















